Header Ads Widget

 


करमाळा-
           पशुसंवर्धन विभागातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या, अंशकालीन 18 कर्मचाऱ्यांचा गेली आठ महिन्यापासून पगार रखडला होता. या प्रश्नासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडण्यात आला. यावेळी गुरुवारपर्यंत सर्व 18 कर्मचाऱ्यांचा पगार करमाळा पंचायत समिती कडे वर्ग करू, असे आश्वासन कुलदीप जंगम यांनी दिले आहे. या शिष्टमंडळात एम. ए. बाराव, ए. एफ. तांबोळी, एस. व्ही. गोरे, एस. एस. सावंत, आर. टी. शिंदे, व्ही. एल. पाटील, वारजे बी.बी., पवार बी. एन., चोपडे बी.एम., जी.शेख, एन.डी. शेख असे 18 कर्मचारी समाविष्ट होते.
           यावेळी बोलताना पशुसंवर्धन अंशकालीन कर्मचारी बाप्पा चोपडे म्हणाले की, गेली आठ महिन्यापासून आमचा पगार थकला होता. आम्ही वारंवार पुढाऱ्यांकडे व अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारले परंतु थकलेला पगार मिळाला नाही. यानंतर आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाप्रमुख चिवटे यांची करमाळा येथे भेट घेऊन या संदर्भात आमची कैफियत मांडली. या प्रकरणाचा त्यांनी तात्काळ पाठपुरावा करून आमचा थकीत पगार मिळवून देण्याची आशा पल्लवीत केली आहे. हा पगार मिळाल्यानंतर आमचा दसरा आणि दिवाळी सुखात जाणार आहे. तातडीने निर्णय घेऊन प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याबद्दल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे अंशकालीन पशुसंवर्धन कर्मचारी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. 

          या अंशकालीन कर्मचाऱ्यांना 24 तास काम करून केवळ 60 टक्के पगार दिला जातो. हा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून या सर्व कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतनवाढ द्यावी. याचा ही प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी तयार करून, शासनास पाठवण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावून, 24 तास काम करणाऱ्यांना उर्वरित 40 टक्के पगार वाढ देतील. असा विश्वास महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे. 

Post a Comment