वैराग- माढा रस्ता मालवंडी येथील ओढ्यालगत असलेल्या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. बार्शी तालुक्यातील मालवंडी या गावाला जोडणारे बार्शी–मोहोळ, माढा–वैराग या चारही रस्त्याची चाळण झाली आहे. मालवंडी हे गाव चौकात असल्याने इर्ले, इर्लेवाडी, सुर्डी, तुर्कपिंपरी, मानेगाव, जामगाव, केवड, उंदरगाव, गुळपोळी, कोरफळे, धानोरे, वडाचीवाडी या आसपासच्या गावातील हजारो वाहने या रस्त्यावरून येत-जात असतात. बार्शी, मोहोळ, माढा या तीन तालुक्याला जोडणारा हा मार्ग मागील चार ते पाच वर्षापासून खराब झाला आहे. रस्त्यांची चाळण झाली असून अनेक अपघात होऊन देखील याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. मागील वर्षी शेतकरी संघटनेच्या वतीने मालवंडीत "रास्ता रोको आंदोलन" केल्यानंतर खड्डे बुजवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र आश्वासन देखील रस्त्यावर पडलेल्या खड्यात गेल्याची भावना या परिसरातील नागरिकांची झाली आहे. रस्ते खराब असल्याने अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वरील सर्व रस्ते तत्काळ दूरूस्त करावे. अशी मागणी या परिसरात असलेल्या विविध गावातील ग्रामस्थ करत आहेत.
रस्ते अत्यंत खराब झाले आहेत, खड्यामध्ये रस्ता शोधून गाडी चालवावी लागते. शेतकऱ्यांनी आंदोलन करून देखील प्रशासन दखल घेत नाही. नागरिकांचा अपघाताने जीव गेल्यावर प्रशासन, लोकप्रतिनिधी जागे होणार आहेत का? चारही रस्ते तत्काळ नवीन बनवायला हवेत.–प्रवीण पाडुळे, गावकरी मालवंडी
मालवंडी–मानेगाव रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्ते लहान झाल्याने गाडी चालवणे कठीण झाले आहे. नवीन रस्ते करावे यासाठी आम्ही गावकरी मागणी करीत आहोत. एखादा अपघात होण्याअगोदर रस्ते बनवायला हवेत.–सागर नाईकवाडे, मानेगाव
निवडणुका येतात त्या वेळी प्रत्येक पक्षाचे उमेदवार प्रामुख्याने गावातील समस्या व रस्त्याचा विषय घेऊन मते मागतात. मात्र निवडणुका संपल्या कि दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष करतात. मोहोळ–बार्शी रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरू आहे. त्यामुळे संबंधित रस्त्याची व पुलाची त्वरित दुरुस्ती होणे गरजेचे बनले आहे. देवाकडे एकच प्रार्थना आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांना रस्ते दुरुस्त करण्याची सुबुद्धी देवो.–शिरीष चिकणे, माजी ग्रामपंचायत सदस्य, गुळपोळी





Post a Comment