Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)

                    करमाळा तालुक्यातील केम परिसरातील ब्रिटिशकालीन वडशिवणे तलावात दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडावे. अशी मागणी केमचे युवा नेते माजी सरपंच अजित तळेकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे कि, वडशिवणे तलावाची निर्मिती ब्रिटिश सरकारच्या काळात सन 1902 ला झालेली आहे. तलावाची एकूण पाणी साठवण क्षमता 153.61 दशलक्ष घनफूट असून, उपयुक्त पाणीसाठा 150.79 दशलक्ष घनफूट आहे. व मृतसाठा 2.82 दशलक्ष घनफूट आहे. तसेच तलावाच्या डाव्या कॅनॉलची लांबी दहा किलोमीटर असून, उजव्या कॅनॉलची लांबी तीन किलोमीटर आहे. तालुक्यातील मांगी नंतर दोन नंबरचा तलाव म्हणून हा तलाव ओळखला जातो. या तलावातील पाण्यावर अकराशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. पूर्वी पाऊस भरपूर असायचा व हा तलाव दरवर्षी पाण्याने भरत होता. परंतु 1998 नंतर अद्याप पर्यंत हा तलाव एकदा ही पाण्याने भरलेला नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील लहान-मोठे प्रकल्प पाण्याने भरलेले असताना, या तलावात मात्र जेमतेम खड्डे भरून फक्त दोन ते तीन फूट पाणी आहे.
              या भागातील बरीचशी शेती याच तलावावर अवलंबून आहे. या तलावावरून पूर्वीच्या काळी वडशिवणे, कविटगाव, सांगवी, बिटरगाव इत्यादी गावची जमीन कॅनॉल खाली बागायत होती. व या तलावाचा फायदा सातोली, मलवडी, केम, पाथर्डी इत्यादी गावांना होत होता, परंतु सध्या पाणी नसल्यामुळे त्याचा फटका या परिसरातील शेतीला बसलेला आहे. या तलावात कायमस्वरूपी उजनीचे पाणी यावे ही या परिसरातील शेतकऱ्यांची बरेच दिवसांची, म्हणजेच उजनी धरण झाल्यापासून मागणी आहे. परंतु अद्याप ती मागणी पूर्ण झालेली नाही. या कामासाठी या परिसरातून प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे, आमदाराकडे मागणी केलेली होती. परंतु ते काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत असताना मोर्चे, रास्ता रोको आदी प्रकारे व भव्य पाणी परिषद घेऊन, पाण्याची वेळोवेळी मागणी केलेली आहे. परंतु त्याला यश आलेले नाही. या कामासाठी दोन वेळा मंत्रालयात बैठकाही झाल्या. परंतु उजनीचे पाणी वाटप पूर्ण झाल्यामुळे व उपसा सिंचन योजने करता पाणी शिल्लक नसल्यामुळे, योजना मंजूर होऊ शकली नाही. पर्याय म्हणून सीना-माढा योजनेतून किंवा भीमा सीना जोड कालवा बोगदा यातून ही पाणी मागणी केली होती. पण त्यास ही मंजुरी मिळाली नाही व सर्व प्रयत्न करूनही या योजनेला यश न आल्यामुळे, परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या होत्या. पण 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी या भागातील ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तळेकर यांनी तत्कालीन आ. नारायण पाटील यांचे कडे मागणी केल्यामुळे, त्यांनी स्वखर्चातून दहिगाव उपसा सिंचन योजनेतून या तलावात पाणी सोडले होते.
              मलवडी परिसरातील शेतकऱ्यांनी या योजने करता स्वतःच्या मालकी हक्काच्या जमिनीतून कॅनॉल काढून दिले होते व सहकार्य केले होते. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये नारायण पाटील यांचा पराभव झाला. व त्यानंतर या तलावात पाणी येणे बंद झाले. सध्या उजनी धरण पूर्ण भरलेले असून, एक लाख 20 क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. या तलावात पाणी येण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे दहीगाव उपसा सिंचन योजनेतून या  तलावात पाणी सोडणे हाच आहे आणि ते शक्य झालेले आहे. परंतु त्यासाठी प्रशासकीय मंजुरीची गरज आहे शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यास, दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा तलाव भरून घेतल्यास परिसरातील शेतकऱ्यांना वर्षभर पाणी पुरणार आहे. तरी कृपया या योजनेकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. या तलावात पाणी आल्यानंतर केम व केम परिसराचा कायापालट होणार असून परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे.
                               सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे सगळी धरणे,तलाव भरली आहेत सोलापूर जिल्ह्यातील जीवनदायी समजलेल्या ऊजनी धरण भरले आहे जिल्हा त महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र केम परिसरातील ् ब्रिटिश कालीन तलाव आज पावसाळयात फक्त २फूट पाणी आले आहे जर दहिगाव ऊपसा सिंचन योजनेतून या तलावात पाणी सोडल्यास वडशिवणे,केम मलवडि,भाळवणी,कविटगाव पाथुडीं या गावांना फायदा होऊन हाजारो हेव्टर क्षेत्र ओलीता खाली  येईल.

गणेश पवार- सामजिक कार्यकर्ते, वडशिवणे 

Post a Comment