Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
             सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जूना गट म्हणून जगताप गटाची ओळख आहे. देशभक्त स्वर्गीय नामदेवराव जगताप व स्वर्गीय पांडुरंग आण्णा जगताप यांच्या माध्यमातून, जगताप गट स्वातंत्र्यपुर्व काळापासून आजपर्यंत करमाळा तालुक्यातील राजकारण व समाजकारणात केंद्रस्थानी राहीला आहे. हा गट फक्त तालुक्यापूरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकारणात सुद्धा आपला दबदबा निर्माण करण्यात मागे राहीला नाही. आमदारकीच नव्हे तर जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्य परिवहन मंडळ सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, राज्य सहकारी बाजार संघ संचालक आदी पदांना जगताप गटाने गवसणी घातली आहे. जगताप गट हा १९३६ पासून अठरापगड जातींचा, सर्वधर्म समभाव मानणारा युवकवर्ग ते वयोवृद्ध जेष्ठांचा, सदैव जनतेची सेवा करणारा गट आहे. त्याचप्रमाणे करमाळा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व राजकिय पदांवरती जगताप गटाचे प्रतिनिधी नेतृत्व करत आहेत. 
         स्वर्गीय नामदेवराव जगताप यांनी तालुक्याचे स्वतः पाच वेळेस व आरक्षण काळात कार्यकर्त्यानी दोन वेळेस अशा प्रकारे तालुक्याचे नेतृत्व केले आहे. तसेच त्यांच्या निधनानंतर जयवंतराव जगताप यांनी १९९० साली अपक्ष एक वेळेस व शिवसेना पक्षातून एक वेळेस असे दहा वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले आहे. त्यांचे धाकटे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी शैक्षणिक वाटचाल चालू असताना २०१८ साली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकी पासून राजकिय वाटचालीला सुरुवात केली आहे. सत्ता स्थापनेवेळी राजकीय कुरघोड्यांमुळे  ५६ दिवस कारावास भोगला असून, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. २०१९ विधानसभा व लोकसभा निवडणुकीत तसेच दरम्यान च्या काळात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या व सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीत, २०२३ साली झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व खरेदी -विक्री संघाच्या निवडणूकीत विशेष महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. यातूनच त्यांची खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणुन बिनविरोध व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक येथे निवड झाली. 

          दरम्यानच्या काळात त्यांच्या कार्याची दखल घेवून भाजपा या राष्ट्रीय पक्षाने जिल्हा यूवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्याकडून अनेक समाजपयोगी विधायक उपक्रम राबविले गेले. तालुक्यासह संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघ पिंजून काढून युवकांचा दांडगा जनसंपर्क वाढविला आहे. पक्षाचे निष्ठेने काम करत असताना मनोज जरांगे-पाटील यांच्या आरक्षण मुद्दयावर, मराठा समाजाला जाहीर व निर्भीडपणे पाठींबा दिला गेला. त्यामुळे पक्षाने शंभुराजे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली. अशा स्थितीत खचून न जाता त्यांनी पूर्ण क्षमतेने समाजकार्य चालु ठेवून शंभुराजेनी त्यांच्या कार्याची छबी उंचावली आहे.

        त्याचप्रमाणे वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. प्रामुख्याने जगताप गट व युवि नेतृत्व या धोरणातुन तालुक्यात युवकांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे जगताप गट हा जुना गट असल्यामुळे, आतापर्यंत या गटाकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फौज सोबत आहे. जर शंभुराजे जगताप या विधानसभा निवडणुकीत उतरले तर फक्त मराठा समाजच नव्हे, तर सर्वच समाजाच्या वतीने मतरूपी आशिर्वाद मिळू शकतो. त्याचप्रमाणे जर जरांगे पाटलांकडून शंभुराजे यांना उमेदवारी मिळाली. तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे तरुण आमदार म्हणून ते ओळखले जाऊ शकतात.


Post a Comment